"आनंद शोधायचा नसतो… तो आपल्यातच असतो"

योशी नावाचा एक तरुण आपल्या गुरुंकडे गेला.
"सेन्सेई (गुरु), मी तुमचं सगळं ऐकलं – ध्यान केलं, सेवा केली, मन लावून काम केलं… तरीही आनंद सापडत नाहीये."
गुरु त्या क्षणी एका झाडाखाली शांत बसले होते. त्यांनी समोर पाहिलं. फुलं वाऱ्यावर नाचत होती. सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाली होती.
सेन्सेई हसत म्हणाले —
"आनंद म्हणजे सूर्यप्रकाशासारखा असतो. त्याला धरता येत नाही. तो फक्त परावर्तित होतो."
आणि मग त्यांनी एक गोष्ट सांगितली…
एकदा एका भिक्षूला एक जादूचा दिवा सापडतो. त्यातून एक जिन्न बाहेर येतो. तो म्हणतो, "तीन इच्छा माग" !
भिक्षू पहिली इच्छा मागतो – ‘संपूर्ण जगातली उपासमार संपव’ जिन्न म्हणतो – "ते शक्य नाही."
दुसरी इच्छा – ‘सगळ्यांना आनंदी कर’ तेही जिन्न नाकारतो.
भिक्षू विचार करतो… आणि शेवटी एक वेगळीच मागणी करतो – “मला कायम समाधानी बनव.”
आणि हीच एकमेव इच्छा जिन्न पूर्ण करतो.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================

आता योशी आणखी गोंधळतो !
“सेन्सेई, पण यात आनंदाचा काय संबंध?”
“म्हणजे समाधानी राहण्याचा आणि आनंदाचा काय संबंध?”
सेन्सेई फुलांकडे पाहत म्हणाले —
"तू आनंद मागतोयस, पण तो मागून मिळत नाही. तो उगम होतो — स्वीकारातून."
ज्याला हृदयातून समाधान मिळतं, त्याचं जीवन आनंदाने भरलेलं असतं — कारण त्याला बाहेरून काही मिळवायचं नसतं.

आनंद दिसतो – पण तो प्रतिबिंबात.
"समाधानी मनातला सूर्यप्रकाशच, दुसऱ्यांच्या जीवनात आनंद उजळवू शकतो."
आपण जेव्हा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, जेव्हा आपण आजच्या क्षणात जगतो… तेव्हा तो आनंद आपोआप परावर्तित होतो.
आनंद "माझ्याकडेच" आहे, हे समजून घेतल्याशिवाय तो सापडत नाही.
सुख आणि दुःख परिस्थितीनुसार येत जात असतात ....आनंद आपल्यापाशीच असतो म्हणून तो कायम टिकतो !


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !