'अतिविचार' हेच अनेक समस्यांचे मूळ असते !

अलीकडच्या काळात अनेक लोकांना अतिविचार करण्याच्या समस्येने ग्रासलेले आहे असे विधान केल्यास वावगे ठरणार नाही. अनेक लोक हे कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करतात आणि आपल्या मेंदूला त्यामुळे सतत व्यस्त ठेवतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत कोणीच या सवयीला समस्या म्हणून पहात नव्हते.. पण तुम्हाला माहितीये .. हल्ली ही समस्या एवढ्या झपाट्याने फोफावते आहे की या एका वाईट सवयीमुळे माणसांच्या जीवनात अन्य अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत.'पॅरेलिसिस बाय ऍनालिसिस' अशा छोट्याशा संज्ञेत या समस्येला बसवता येऊ शकेल.
अतिविचार करण्याची सवय का आणि कशी लागते ?
ही सवय लागण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत ती म्हणजे -

1. दुसऱ्यांशी तुलना करणे -
बरेचदा असं होतं की आपण आपली स्वप्न काही कारणाने पूर्ण करू शकत नाही.. आणि त्यामुळे आपण स्वतःवरच नाराज असतो. अशातच जर आपल्यासारखीच स्वप्न असलेली एखादी यशस्वी व्यक्ती, मग ती परिचित असो वा नसो वा कोणी सेलिब्रिटी असो.. तिला तिची स्वप्न पूर्ण झालेली पाहताना आपण मनोमनी आपसुकच आपली तूलना तिच्याशी करतो आणि वारंवार खिन्न होत जातो. हे करणं थांबवलं पाहिजे. आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रीत केलं तर हे करणं सोपं जातं. कारण, आपण आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करून आपला वर्तमान व पर्यायाने आपले भविष्य पुन्हा घडवू शकतो.

2. अंतर्मनाची साद ऐका -
तुम्ही वर्तमानात काहीही करत असलात तरीही तुमच्या अंतर्मनातून जी साद येते त्याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका. तुमचं अंतर्मन तुम्हाला जीवनाचा रस्ता दाखवत असतं, त्यामुळे तुम्ही त्या मार्गावरून पुढे जात रहा. जेव्हा तुम्ही आतल्या आवाजाच्या दिशेने जात रहाल तेव्हा तुमचा मेंदू अतिविचार करणार नाही तर अंतर्मन सांगतय त्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरूवात करेल.. आणि त्यामुळेच तुमच्या मनावर येणारा ताण आपोआप कमी होऊन तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करू लागाल, जे अधिक सुखद असेल..

3. भूतकाळात रमणं जाणीवपूर्वक थांबवा -
अतिविचार करण्याची समस्या असणाऱ्या सर्वांनाच भूतकाळात रमण्याची एक अत्यंत वाईट सवय असते.अशा लोकांचा मेंदू बऱ्याच अंशी भूतकाळातील भल्याबुऱ्या घटनांच्या स्मृतींनी व्यापलेला असतो आणि वर्तमानकाळातील घटनांसाठी त्यामुळेच यांच्या मेंदूत अत्यल्प जागा असते. लक्षात घ्या जे लोक वर्तमानात वावरतात ते अधिक सशक्त असतात. सतत भूतकाळाचा विचार करणे ही फार मोठी चूक तुम्ही करताय हे लक्षात घ्या, कारण, यामुळे तुम्ही तुमच्या दुःखात भरच घालत असता. तुम्हाला स्वतःबद्दल अधिकाधिक निराश, हताश वाटण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भूतकाळाशी सतत तुलना करणे. त्यापेक्षा तुमचा भूतकाळ आहे तसा स्वीकारा, त्यातून योग्य ती शिकवण घ्या आणि पुढे चला. तसे केल्याने तुम्ही तुमचा वर्तमान अधिक सशक्तपणे घडवण्यास सुरूवात करताय हे लक्षात घ्या.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

4. नवीन गोष्टी शिकत रहा -
अतिविचार करणं थांबवायचं असेल तर स्वतःला नवनवीन गोष्टींमध्ये रमवा. नव्या गोष्टी करून पहा, नवं काहीतरी शिका. यामुळे तुमच्या मनातील अतिविचार दूर होतील तसेच नकारात्मक विचारांपासूनही तुम्ही लांब राहू शकाल.

यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे मेडीटेशन. खालील लिंकवर क्लिक करुन आमचा फेसबुक ग्रुप जॉईन करा आणि विनामूल्य ध्यानसत्रांमध्ये सहभागी होऊन स्वतःमधील विलक्षण बदलांचे साक्षीदार व्हा.
facebook.com/groups/netbhetmm21

5. मनमोकळं बोला -
तुमच्या विश्वासातील मित्र, मैत्रीण वा जीवलग कोणीही व्यक्ती जी विश्वासार्ह असेल अशांशी मनमोकळेपणाने बोला. बरेचदा आपण मनात एखादा विचार करतो आणि तोच विचार सतत करत रहातो, मनात कुढत रहातो. त्याऐवजी आपल्या मनातील चांगला वा वाईट कोणताही विचार आपल्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला. यामुळे तुमचं मन मोकळं तर होईलच पण तुमच्या मनातील एखाद्या क्षुल्लक पण अतिविचारामुळे फार मोठ्या झालेल्या विचाराला तुम्ही सहज झटकून टाकू शकाल.

6. मनातले विचार लिहून काढा -
डायरी लिहीणे, ब्लॉग लिहीणे ही सवय लावा. मनातल्या विचारांना वाट करून देणं व त्यातून बाहेर पडून वर्तमानावर लक्ष केंद्रीत करणं महत्त्वाचं.. लक्षात घ्या, विचार करून तुमचा वर्तमान व भविष्य घडणार नाहीये, तर कृती करून घडणार आहे.. !!

7. सोडून द्यायला शिका -
असं बरेचदा होतं की कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं, किंवा आपल्यावर एखाद्याने केलेली सहेतूक वा निरूद्देश कमेंट आपल्याला मात्र चांगलीच लागते. अशावेळी आपण हर्ट होतो आणि त्याबद्दल अतिविचार करू लागतो. हीच सवय सोडली पाहिजे आणि त्यासाठीच क्षमा करायला आणि सोडून द्यायला शिकलं पाहिजे. कारण आपण जर त्याचाच विचार करत बसलो तर आपलं मन अस्थिर आणि उदास होत जाईल. परिणामी आपण आपलं स्वास्थ्य गमावून बसू.. म्हणून एकतर समस्या सोडवा किंवा सोडून द्यायला शिका.

8. ध्यान करा -
अतिविचाराची सवय सोडण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे ध्यान करणे. हे सिद्ध झालेले आहे की दररोज ध्यानधारणा केल्याने मनःशांती मिळते आणि हा अनुभव अतिविचार करणाऱ्या लोकांच्या मनावर औषधासारखा काम करतो. आपलं मन ताब्यात ठेवण्यासाठी दररोज ध्यान करा. यामुळे तुम्ही नक्कीच मनःशांतीचा अनुभव घ्याल.

मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याकडे खरंतर वेळच नाहीये, पण अनेक माणसं अशीही आहेत, ज्यांना स्वप्नपूर्ती न झाल्याने अतिविचार करण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. कोरोनाच्या या वाईट काळात अनेकांनी आपले आप्तेष्ट, जिवलग गमावले आहेत. अनेकांची स्वप्नं भंगली आहेत, आणि त्यामुळेच अनेकजण या समस्येशी झुंजताना दिसू लागले आहेत.. आपणही जर अतिविचार करण्याच्या समस्येने ग्रासले असाल तर आजच वरीलपैकी एखादी सवय स्वतःला लावा व आपल्या भविष्याची स्वप्न पुन्हा एकदा नव्या उमेदीने रंगवायला सज्ज व्हा ..

धन्यवाद,

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy